काळ - ८० च्या दशकातील, स्थळ - कुलंगवाडी
पावसाळ्यात ट्रेकला जायची आमची दोन हमखास आवडीची ठिकाणे म्हणजे भीमाशंकर व कुलंग. तेव्हा कुलंगवाडी, कुलंगच्या पायथ्याचे गाव, हे बाह्य व्यावसायिक जगापासून खुपच दूर होतं, कारण ईथे यायला रस्ताच नव्हता मुळी. सर्वात जवळची गावं म्हणजे काळुस्ते किंवा बाहुली, जेथे जायला ३ तास चालत जावं लागत असे !!
पण गावातल्या लोकांनी ह्यावर एक जबरदस्त उपाय शोधून काढला होता. ते आफ्रिकेतील लोकांप्रमाणे दोन उंचच उंच काठ्यांवर उभे राहून चालायचे. लहान लहान पोरं पण लिलया त्या उंच काठ्यांचा वापर करून गावभर बागडत असत. त्यामूळे दोन फायदे व्हायचे, एक म्हणजे चिखलापासून सुटका व दुसरं असं की लांबच लांब ढांगा टाकत चालता येत असल्यामुळे दूरची अंतरं फटाफट कापता यायची.
एकदा आम्ही आपापसात म्हणालो की आपणंही असंच काठ्यांवरून चालत कुलंगवाडीच्या बाहेरपर्यंत जाऊया जेणेकरून आपला खुप वेळ वाचेल. लहान पोरंसुध्या इतकं आरामात हे करत होती की ते अतिशय सोप्पं वाटत होतं. मग आम्ही गावातल्या पोरांकडून काठ्या उसन्या घेऊन त्यावर उभं राहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कळलं की हे काम दिसतंय तेव्हढं सोप्पं अजिबातच नाहीये. त्या काठ्यांवर उभं राहण्याच्या नादात, आम्ही जवळजवळ सर्वच जण, तोल जाऊन खाली चिखलात इतकेवेळा पडलो की काही विचारू नका. आधी फक्त पायच बरबटायचे पण आता संपूर्ण अंग व कपडे बरबटलेले होते. साधारण अर्धा पाऊण तास बरबटल्यानंतर आम्ही काठ्यांवरून चालायचा अट्टाहास सोडून दिला व कुंलंगकडे मार्गस्थ झालो.
सह्याद्रीच्या गावांमध्ये कोणा कोणाला असा अनुभव आला आहे? मी तरी कुलंगवाडी व खांडस सोडून ईतर गावात कोणाला असे काठ्यांवरून चालताना बघितलेले नाही. कॅामेंटमध्ये जरूर सांगा.
- अभिजित दांडेकर
फोटो सौजन्यः गुगल
No comments:
Post a Comment